Tuesday 25 July 2017

महाराष्ट्रातील शिवकालीन दुर्ग




महाराष्ट्रातील  दुर्ग 















शिवाजी महाराज किल्ल्यावर खूप खर्च करतात असे काही अनाहुत हितचिंतकांना वाटले. त्यांनी राजांजवळ चिंता व्यक्त केली. तेव्हा महाराज म्हणाले, ''जैसा कुळंबी शेतात माळा घालून शेत राखतो तसे किल्ले राज्यास रक्षक आहेत. तारवांस नाव खिळे मारून बळकट करतात तशी बळकटी किल्ल्यांची आहे. किल्ल्यांच्या मार्गाने औरंगशहा सारख्यांची उमर गुजरून जाईल.''पुढे अगदी तंतोतंत तसेच झाले. औरंगजेब मेला परंतु महाराजांचे किल्ले आजही आपण पहातो दुर्ग म्हणजे स्वराज्याची शल्पे आहेत. राजे दुर्गावर खर्च करत नव्हते,त्यांनी ती स्वराज्यासाठी,स्वराज्याच्या भावी पिढ्यांसाठी केलेली गुंतवणूक होती. राजे दुर्गामातेचे पुत्र होते. ते दुर्गांची पूजा करीत असत. आणि दुर्गांवरती राहत असत. महाराष्ट्राच्या दुर्गानी राष्ट्राचे सौरक्षण निर्मितीमध्ये फार मोलाची भूमिका बजावली. ते भाग्य राजस्थानातील सुंदर महालांच्या नशीबी आले नाही. महाराष्ट्राचे दुर्ग म्हणजे भारतमातेच्या मुकुटातील गौरवमानी. हिंदुस्थानचे पुनरुज्जीवन महाराष्ट्राच्या या ओबड धोबड दुर्गानीच केले आहे. त्यांची तुलना राजपुतांच्या महालांशी होऊ शकत नाही.


 रत्नाजडित  म्यानामध्ये पडून राहिलेल्या सोनेरी तालवारीसारखेच राजपुतांचे महाल आहेत. त्यांनी स्वातंत्र्याची हवा कधी अनुभवलीच नाही. राजपुतांचे महाल म्हणजे मूर्तिमंत शापित सौंदर्य आहे. लढाईत शौर्य गाजवून आलेल्या सैनिकांचे सौंदर्य कशात आहे,आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी त्याने शरीरावर अनेक घाव झेललेले असतात. त्या सर्वांच्या खुणा तो चेहेऱ्यावर,अंगावर मोठ्या गौरवाने मिरवत असतोत्या रक्ताळलेल्या खुणा म्हणजे स्वातंत्र्य देवतेने त्यांना केलेले कुंकुम-तीलक होय. त्या जखमा म्हणजे स्वातंत्र्य देवतेचे सौभाग्य होय. सौभाग्याची तुलना हि हिरे,माणिक,मोती पाचू इत्यादीने केली जात नाही. स्वातंत्र्य देवाता बाह्य सौंदर्यावर फिदा होत. नाही. पुरुषार्थाला ती जीवेभावे ओवाळते. महाराष्ट्राचे लढवय्ये दुर्ग असूनही त्या शौर्याच्या खुणा,स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अंगावर बाळगून आहेत. ह्या दुर्गांकडे पाहिले कि मन भरून येते. स्वातंत्र्य-देवतेने दिवस रात्र एकत्र करून घडवलेली ती शल्पे आहेत. आपल्या रक्त अश्रूंचा अभिषेक तिने त्या शिल्पांवर केला आहे. स्वराज्याची सुगंधी फुले त्यावर उधळलेली आहेत. आणि त्या अप्रतिम शिल्पाला तिने मनोभावे वंदन केले आहे. महाराष्ट्राचे दुर्ग म्हणजे काळे पाषाण आणि दगडगोटे नाहीत

हे दुर्ग म्हणजे स्वराज्याच्या शिल्पकाराने शिवरायांनी घडवलेली स्वराज्याची महान शील्पे आहेत. जेव्हा कधी आपण ह्या दुर्गावर जातो तेव्हा शिवरायांचा भीम पराक्रम साक्षात डोळ्यापुढे दिसू लागतो, घोड्याच्या टापांचा आवाज कानामध्ये घुमू लागतो,श्वासामध्ये स्वराज्याचा प्रेमळ सुगंध दरवळत रहातो. डोळ्यांमध्ये कृतज्ञतेच्या गंगा-यमुना वाहू लागतात,अंतःकरण पवित्र होते,मनाची जळमटी निघून जातात आणि एका नव्या उमेदीने स्फूर्तीने जीवनाचे युद्ध खेळायला मर्द मराठा गडी सुसज्ज होतो. भक्त प्रल्हादाला भगवान विष्णू दगडी स्तंभामध्ये दिसले होते असे म्हणतात. आपल्यालाही या पोलादी दुर्गांमधे स्वराज्याच्या नरर्सिह राजाचे दर्शन होईल. आज भले या नरसिहाचे सोन्याचे सिंहासन कुठे अस्तित्वात नसेल परंतु हा नरश्रेष्ठ आमच्या हृदयस्थ सिंहासनावर कधीच विराजमान झालेला आहे,आणि तो आम्हाला सदैव प्रेरणा देत आहे. अशा या पवित्र शिवतीर्थाची चिमूटभर धूळ आपल्या कपाळी धारण करू या. खरोखरच आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कुणी सांगावे,या धुळीमधूनच पुढे भविष्यात,अनुकूल वेळी एखादा वीर शिवाजी पुन्हा जन्माला येईल.






No comments:

Post a Comment